Tuesday, November 23, 2010

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्यात यावा

पुणे - या वेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले, ""महाराष्ट्रात शांतता हवी असेल तर लाल महालातील कोंडदेवांचा पुतळा तातडीने काढून टाकावा लागेल तसेच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल.''
भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी झालेल्या सभेत आठ ठराव करण्यात मंजूर करण्यात आले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्याबरोबरच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत सर्वोच्च न्यायालयात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख ठरावांचा यात समावेश आहे.
"ज्या हिंदू धर्माच्या नावाने अभिमानाने गळे काढले जात आहेत. मात्र, असा कोणताही धर्म पुरातन काळापासून अस्तित्वात नाही. हिंदू हा आक्रमक मुघलांनी येथील जनतेविषयी वापरलेला अवमानकारक शब्द आहे, चातुर्वर्णाचा पुरस्कार करणाऱ्या उच्च वर्णियांनी बहुजन समाजाला फसविण्यासाठी हिंदू या शब्दाला धर्माचे स्वरूप प्राप्त करून दिले. बहुजनांनी यापासून दूर राहिले पाहिजे'', असे मत "बामसेफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी येथे व्यक्त केले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्यात यावा, असा ठराव या वेळी करण्यात आला.
ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रा. प्रदीप सोळंके, प्रा. प्रदीप ढोबळे, मुफ्ती महंमद सय्यद, प्रा. श्रीमंत कोकाटे, व्ही. डी. गायकवाड, पाटील यांची या वेळी भाषणे झाली. ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी ठरावांचे वाचन केले. विकास पासलकर, रमेश राक्षे यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

इतिहासातले वाद मिटविल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा शांततेने हलवला जाणार नसेल, तर आम्ही तो हलवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवारी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, सचिव व्ही. व्ही. जाधव, पुरुषोत्तम खेडेकर, मुफती मोहम्मद युसुफ, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते. समाजात शांतता हवी असेल तर विकृत इतिहास नको. आंदोलन जसे दादोजी कोंडदेव यांच्या विरोधात आहे, तसेच ते इतिहास विकृत करणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. आजपर्यंत शांततेने पुतळा हलवण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र आता तो हलवला गेला नाही, तर आमचे कार्यकर्ते हलवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुजन समाजाचा आजवर घातच केला आहे. जेम्स लेन प्रकरणातही सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील न पाठवल्याने निकाल विरोधात गेला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासकांनी लेनला मदत केल्यामुळे त्यांच्यावरही खटले भरण्याची मागणी त्यांनी केली. आपला खरा शत्रू कोण ते बहुजन समाजानाने ओळखण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले.

No comments: